लेख लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
लेख लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, ५ सप्टेंबर, २०१०

शिक्षक दिन

भारताचे पहिले उप-राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस, त्यांनी चाळीस वर्ष शिक्षक म्हणून काम केल त्यानंतर हि त्यांनी शिक्षणासाठी विशेष योगदान दिलंय आणि म्हणूनच ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. आई-वडिलानंतर आपल आयुष्य घडवण्यात शिक्षकांचं महत्वाच योगदान असत. अगदी लहान वयात आपल्यावर संस्कार करण्याच काम शिक्षक करत असतो. लहानपणापासून अगदी बालवाडी पासून ते आज पर्यंत शिक्षक म्हणून माझ्या आयुष्यात आलेली प्रत्येक व्यक्ती आठवण्याच मी प्रयत्न करणार आहे.

चार वर्षाचा होतो तेंव्हापासूनच मी पहिलीच्या वर्गात जायला लागलो. शाळा गावातच - घरातून निघालो कि शाळेत जायला दोन रस्ते एक होळीच्या माळावरून आणि दुसरा मरी आईच्या देवळाकडून, ताई, माई आणि दीदी आम्ही सगळे एकाच शाळेत होतो त्यामुळे सगळे सोबत जायचो. नीट धावत सुटायचं कि ५ मिनिटाच्या आत शाळेत, प्रार्थनेला हजर. इयत्ता १ ली च्या वर्गावर अलका बाई शिकवायला होत्या. बाई फार प्रेमळ असाव्यात (कारण मला कधी मारलेल आठवत नाही) आणि त्या शाळेच्या इथेच जवळ कुठेतरी राहत होत्या एवढंच मला आत्ता आठवतंय. गावातली माझ्या बरोबरची मुल-मुली मला आजही आठवतायेत कारण ते सगळे पुढे काही इयत्ता ३ री पर्यंत मझ्या बरोबर होते, चेतन, राजा, गणेश, भगवान, प्रगती, मोनिका, सुशीला आम्ही सगळे अगदी तिसरी पर्यंत एकत्र होतो. दुसरीला आम्हाला भगत बाई होत्या, भगत बाई म्हणजे मोनिकाची आई. बाई जाम मारकुट्या होत्या मी सगळ्यात जास्त मार ह्यांचाच खाल्लाय. मला अजून पण आठवतंय त्याची ती छडी तेंव्हा आम्ही बहुतेक शिपटी म्हणायचो, त्या शिपटी ने खूप मारलं होत अगदी वळ उठे पर्यंत, अंगठे धरायचे मग त्या पाठीवर एक खडू ठेवणार तो खडू पडला कि एक पायावर एक छडी अजून मिळायची. बाईंच लक्ष नसेल तर कोणतरी वर्गातून ओरडून सांगायचा कि बाई खडू पडला कि "फटाक" करून आवाज यायचा अशी शिक्षा मलाच व्हायची असा नाही ब-याच मुलांना-मुलीना व्हायची अगदी सर सकट अख्या वर्गाला सुद्धा शिक्षा केली होती त्यांनी; ५० का कितीतरी उठाबशा करायला लावल्या होत्या त्यांनी मग तेंवा आमच्या बर्याच मुलानाचे आई-वडील त्यांच्या घरी गेले होते असा का केल म्हणून विचारायला. विशेष म्हणजे मोनिका त्यांची मुलगी पण ह्या शिक्षेतून सुटली नव्हती, मला जितक आठवतय त्यावरून तिलाच जास्त मार बसायचा पण वर्गात सगळ्यात हुश्शार तीच होती, तिच्या नंतर नंबर लागत होता तो चेतन दळवी चा, मग बहुतेक प्रगती असेल किंवा राजा आणि मग मी असे आमचे ठरलेले नंबर होते. तिसरी पर्यंत कोणीही कोणाचे नंबर सोडले नाहीत. तिसरी ला आम्हाला शिंदे गुरुजी होते त्यांचा समोरचा एक दात सोन्याचा होता मला पहिले वाटायचं कि जन्मापासूनच असतो असा दात पुढे जेंव्हा कळल कि असा दात बसवता येतो तेंवा माझा मलाच हसायला आल. तिसरीत असतान घडलेला अजून एक प्रसंग मला आठवतोय, शाळा भरायला दहा-पंधरा मिनिटे वेळ होता आईने मला दुकानात अंडी आणायला पाठवलं होत, गावात एकाच दुकान होत त्यावेळी राम दादा च दुकान ते पण शाळेच्या एकदम जवळ म्हणजे अगदी चार-पाच पावलाच्या अंतरावर. मी अंडी घेऊन जातच होतो तितक्यात गुरुजींनी मला बघितलं शाळेचे कपडे घातले नव्हते म्हणून कदाचित गुरुजीना वाटल कि मी आज शाळेला दांडी मारणार आहे. त्यांनी मला आवाज दिला मी घाबरत त्यांच्या जवळ गेलो तेंवा त्यांनी विकॅहाराल काय रे शाळेत नाही का यायचं मी म्हणतलो नाही गुरुजी तसा नाय मी हि अंडी देऊन लगीच येतू . गुरुजी पण हसत म्हणाले अरे एकटाच खाणार का? आम्हाला नाही का? मी म्हणालो घ्या मग तुम्हाला. तर गुरुजी म्हणतात अरे ते कोंबडीच अंड आहे मला कोंबड्याच अंड पाहिजे मला काय कळल नाही मी बोललो ठीक आहे आणतो. घरी गेलो आणि आईला म्हणालो आई गुरुजींनी कोंबड्याच अंड मागितलंय आई पण जाम हसायला लागली. अजून पण कधी कधी आई ला आठवल कि चिडवत असते आणि मझ्या भांच्यांसमोर बोलते अरे मामा ला कोंबड्याच अंड घेऊन ये रे. गावात मस्त उनाड दिवस चालले होते. सकाळी शाळा सुरु व्हायच्या आधी पण खेळायचं आणि शाळा सुटल्यावर पण हुंदडणे चालूच पार काळोख पडायला आल कि अण्णांच्या म्हणजे माझ्या वडिलांच्या गाडीचा आवाज आला कि घरी पळत सुटायचं. असा दाखवायचं कि बाहेर गेलोच नाही खेळायल लगेच अभ्यास वैगरे करायला बसायचं अभ्यासाला बसल्यावर पण जाम टाईम पास म्हणजे पाटी पुसणे, कावळ्या कावळ्या पाणी पी असा म्हणून भिजून आणलेली पाठी सुखवणे. आणि अजून असे किती तरी मजेचे किस्से आहेत. माझ गावातल बालपण ह्यावर स्वतंत्र लेखच लिहिण्याचा विचार करतोय नाहीतर आत्ता शिक्षकांच्या आठवणी शोधताना मीच हरवून जायचो मझ्याच बालपणात.

तिसरी पर्यंतच शिक्षण गावात झाल आणि आम्ही रोह्याला शिफ्ट झालो अण्णांची कंपनी तिकडेच होती धाटाव ला आणि आमच शिक्षण पण शहरात चांगल्या ठिकाणी व्हाव म्हणून आम्ही सगळे रोह्याला राहायला गेलो. सिविल कोर्टाच्या जवळच धनलक्ष्मी नावाची इमारत होती तिथेच आम्ही रूम घेतली होती. रोह्यात बहुतेक दोन मराठी शाळा होत्या एक दगडी शाळा जी मेहंडले हायस्कूल च्या एकदम समोर होती आणि दुसरी शेतकी शाळा, माझ शेतकी शाळेत नाव घातलं, मी तिथे नवीन आणि मला शहर सुद्धा नवीन. जन्मच गावात झाल्या मुळे भाषा थोडी गांवढलच होती. शेतकी शाळा म्हणजे आमच्या घरापासून चालत वीस-एक मिनिटाच अंतर. शाळेला दोन इमारती होत्या दोन्ही इमारतीमाहून एक रस्ता सरळ दमखाडी च्या चौकातून निघून मेहेंदळे हायस्कूल कडे जातो रस्त्याच्या उजव्या बाजूची इमारती मध्ये चार वर्ग होते १ ली ते ४ थी रस्त्याच्या बाजूचा वर्ग आमचा होता इयत्ता चौथी. डाव्या बाजूच्या बिल्डींग मध्ये ५ वी ते सातवी पर्यंत वर्ग होते बहुतेक आता नक्की आठवत नाही. आम्हाला त्यावेळे पाटील गुरुजी होते, गुरुजी खूप मस्त शिकवायचे पण मला हे सगळ वातावरण खूप नवीन असल्यामुळे माझ मन तिथे रमत नव्हत. अभ्यासात लक्ष लागत नव्हत भाषेची तर अडचण होतीच, म्हणजे मला पोर त्यांच्यातला समजत नव्हते. शाळा फ़क़्त मुलांची होती. मित्र फ़क़्त दोनच सिद्धांत जाधव(पप्पू ) आणि ललित चौधरी मित्र म्हणजे फ़क़्त आमच्या जवळपास राहायचे आणि जायला यायला सोबत असायचे म्हणून मित्र मित्रत्व वैगरे काही नव्हताच त्यावेळी सोबती म्हणू.असेच दिवस जात होते मन अजून रामल नव्हत. अभ्यसात मन लागत नव्हत स्वतामध्ये काहीतरी कमी आहे अस वाटत होत. इतरांपेक्षा आपण अभ्यासात फार कमी आहोत. सहामाही चा निकाल लागला आणि माझे मार्क कळले आणि ते फार कमी होते अण्णांना आईला काळजी माझा प्रोब्लेम काय आहे हे त्यांना काळात नव्हते आणि मला ते सांगता येत नव्हते. अशा वेळी गुरुजींच मझ्याकडे लक्ष होत माझा अक्षर फार सुंदर होत असे ते नेहमी वर्गात सर्व मुलांसमोर म्हणायचे माल त्यावेल खूप भारी वाटायचं. पण एक दोनदा त्यांनी मला जवळ बोलावून विचारल म्हणाले ठाकूर तुझ अक्षर फार सुंदर आहे पण शुद्धलेखनाच्या चुका होतायेत फार. त्यांनी ओळखली असावी माझी मनस्थिती म्हणूनच कदाचित त्यांनी वडिलांना शाळेत घेऊन ये म्हणून सांगितलं.मला खर तर त्यावेल खूप भीती वाटली होती. मनातल्या मनात म्हणालो इतक्या लहान चुकांमुळे कशाला घरच्यांना बोलावतायेत थोडासा राग पण आला होता. पण नंतर मला कलाल कि त्यांनी माझ खूप कौतुक केला होत अण्णांसमोर आणि सांगितलं होत कि भाषा थोडी गावाकडची असल्यामुळे तो बोलायला जरा लाजतो आणि मग तेवढा अक्टीव नाही राहत वर्गात आणि म्हणून थोडा कमी पडत असेल अभ्यासात आणि मग ते माझ्याकडे खूप लक्ष देऊ लागले ते अधून मधून गप्पा मारायचे गोष्टीची पुस्तक द्याचे वाचायला मला खूप मज्जा वाटू लागली आणि हळू हळू मन रमू लागल. आणि सोबती होते ते मित्र होऊ लागले खेळायला शिकवणी ला आम्ही सगळे एकत्र जाऊ लागलो. वार्षिक परेक्शे मध्ये मला मस्त मार्क्स मिळाले. गावात अगदी पहिल्या पाच मध्ये असायचो तसं नंबर वैगरे नाही मिळवता आला पण पहिल्या १२ व नंबर होता. त्यात मी खुश होतो आणि घराचे सुद्धा. सहामाहीच्या ६० टक्केवारी वरून एकदम ८० च्या घरात उडी घेतली होती. शाळा माल आपली वाटू लागली होती आणि गुरुजी सुद्धा. पण चौथी मधून पाचवीत म्हणजे आत्ता मेहेंदळे हायस्कूल ला Admission घेतलं पाचवी इयत्ता, खूप मोठ्ठी शाळा, ३-४ माजली इमारती होत्या मोठे वर्ग बस्याला बेंच आयुष्यात पहिल्यांदा बेंच वर बसणार होतो. शेतकी शाळा फ़क़्त मुलांची होती पण इकडे वर्गात मुली होत्या, उजवीकडे मुलींचे बाक आणि डावीकडे मुलाचे. पहिला बाक मिळावा म्हणून धडपड असायची आधीच उंचीने कमी त्यात मला तेंव्हा पासून चष्मा लागला होता. चष्मा पडू नये म्हणून तिला एक रस्सी होती ती गळ्यात अडकवायाचो पक्का ढापण्या वाटत असणार मी तेंव्हा आणि म्हणूनच पोर चिडवायची मला ढापण्या म्हणून आत्ता आठवल कि हसायलाच येत. पाचवी ला माझ Admission उशिरा झाल होत म्हणून मग मला पप्पू आणि ललित ची तुकडी नाही मिळाली. मी 'क' तुकडी मध्ये होतो. तेंव्हा माझा वर्ग मित्र होता संतोष दक्षिकर पाचवी पासून प्रत्येक विषयाला वेगळे वेगळे शिक्षक. मेहेंदळे हायस्कूल ला मी दोन वर्ष होतो पाचवी आणि सहावी. सगळे शिक्षक चांगलेच होते आत्ता फ़क़्त साठे म्याडम तेवढ्या आठवतायेत कारण त्यांच्याकडे आम्ही शिकवणी ला जायचो त्याचं घर मला खूप आवडायचं बंगलाच होता तो मागे एक विहीर होती त्याच्या कासव सोडले होते. आम्ही शिकवणी झाल्यावर खूप वेळ त्या विरीजवळ कासवाची गम्मत बघत उभे असायचो. सातवीला होत्या वर्गशिक्षिका होत्या फानाशिकर म्याडम. पाचवीला वर्गात पहिला होतो तर सहावी ला पहिला आलो होतो. सातवी ते बारावी माझ शिक्षण नागोठण्यात झाल. अण्णांनी नोकरी सोबत व्यवसाय सुरु केला होता. गावाजवळ नवीन कंपनी येणार होती व्यवसायाची खूप मोठी संधी दिसत होती त्यामुळे गावाकडे जाव लागणार होत. पण पुन्हा सगळ्यांच्याच शाळेचा प्रोब्लेम होणार होता म्हणून मग आम्ही गावापासून जवळ असलेल एक मस्त शर नागोठणे तिथे राहायला गेलो. शहरातल्या सरकारी दवाखान्याजवळ टक्क्यांची बिल्डींग होती तिथे आम्ही खोली घेतली होती शाळा तिथून खूप दूर होती पण आमच्या बरोबरची खूप मुल तिथे होती. अभिजित कोकणे, शैलेश टक्के, दीप्ती ताई, माई, दीदी आणि रस्त्याने जाताना चंदूच, ईशाच, प्रशांत धामणेच याचं घर लागायचं आम्ही सगळे सोबत शाळेत जायचो. नागोथाण्याचे सगळे शिक्षक म्हणजे एक आठवणीचा खूप मोठ्ठा ठेवा आहे प्रत्येक शिक्षकावर खूप काही लिहिता येईल. पुढे जस जस वेळ मिळेल तस मी लिहित जाणार आहे पण आत्ता फ़क़्त थोडक्यात सांगतो. कारण पोस्ट शिक्षक दिनाच्या दिवशी पोस्ट करायचा होता पण लिहित गेली आणि लिहीतच राहिलो.
पी. पी. पाटील एक जबरदस्त अक्टीव माणूस आणि तसच व्यक्तिमत्व गणित शिकवायचे. ठाकूर सर म्हणजे मला भावबंद म्हणून हाक मारणारे एक मेव सर पण रागावले तर हात असेल ते फेकून मारतील नाहीतर जाम माया करतील असे होते आम्हाला हिंदी शिकवायचे. मारकुटे सोलेगावकर सर चित्रकला शिकवायचे.मानगुटी धरून खाली वाकवायचे आणि पाठीत बुक्का मारायचे. मराठी वर नांदगावकर म्याडम होत्या खूप सुंदर आवाज होता त्यांचा स्नेहसंमेलनाच्या वेळी त्याच गाणी गायच्या आणि समालोचन पण त्यांच्याकडेच असायचं आणि ते त्यांना खूप मस्त जमायचं. इंग्रजी शिकवायल भोनकर सर होते, एकदम भारी माणूस ते वर्गात आल्यावर कंटाळा निघून जायचा हसत खेळत शिकवायचे, आणि त्यांना पटकन कळायचं कि पोर वैतागलीत मग ते जोक्स सांगायचे. मज्जा यायची. आ. ना. ठाकूर इतिहासावर होते इतिहास म्हणजे गोष्टी आणि नुसत्या गप्पा, फ़क़्त साल लक्षात ठेवायची गोची होती. पाटील आडनाव असलेलेल खूप सारे शिक्षक होते. पुढेह दहावी पर्यंत इथेच म्हणजे श्रीमती गुलाबबाई रामनिवास अग्रवाल विद्यामंदिर, नागोठणे ह्या शाळेतले दिवस म्हणजे खूप मज्जा आणि मस्ती पण हो अभ्यासात मात्र मी मागे मागे पडत चाललो होतो इतका मागे कि इयत्ता नववी मध्ये सहामाहीला वरपास झालो म्हणजे बाकी सगळे मार्कस ठीक होते पण बीजगणित ४-५ मार्क्स मुळे वरपास, ओढून ताणून पास झालो होतो आयुष्यात पहिल्यांदाच अस झाल म्हणून निकाल पण घरी नव्हता दाखवला. पुढे मराठी वर परांजपे म्याडम एकदम शांत स्वभावाच्या, झरे सर सुधा तशेच शांत होते ते इंग्रजी वर होते १० ला असताना, तुरे सर म्हणजे तिरसट माणूस बीजगणित शिकवायचे शिकवणे चांगल होत पण माणूस म्हणून चांगले नव्हते बहुतेक मला तरी नाही आवडायचे ते सर. जम्बले सर म्हणजे एक टापटीप, शिस्तप्रिय, व्यक्तिमत्व ई.भू.ना.(इतिहास भूगोल नागरिकशास्त्र) शिकवायचे त्यांचे काही ठरलेले शब्द होते. कोणत्याही नवीन मुद्द्याची सुरुवात करताना म्हणायचे "तर आत्ता आपल्याला पाह्यचे आहे 'पर्यावरण'' आणि हे म्हणताना काही विशिष्ट शब्दांवर जोर द्यायचे, कोणाच शिकवण्याकडे लक्ष नसेल तर म्हणायचे "ये लक्ष कुठे आहे गांडुळ कुठला अशी वळवळ काय चाललीये, टरबूज, टमरेल, चीम्पाजी" असे त्यांचे काही पेटंट शब्द होते. वाय. एन. पाटील सर पिटी ला होते. आर आर पाटील सर, वाघमारे सर हे हि होते. त्यावेळी मुख्याद्यापक होते परांजपे सर, मग नंतर महाजन सर आले. दोन्ही माणस खूप खूप भारी होती.

दहावी झाल्यावर ११ वी शास्त्र शाखेला प्रवेश घेतला. तिथे मराठीवर विरुळकर सर होते त्यांना आम्ही संत विरुळकर म्हण्याचो अत्यंत शांतता प्रिय माणूस, मोत्यासारख गोल अक्षर, आणि ओळ न ओळ समजून द्यायचे. Physics- भोगे सर हे काय बोलायचे तोंडातल्या तोंडात ते कोणालाच काळात नव्हत पण स्वभाव फार छान होता त्यांचा, Maths वर देवसरकर सर होता प्रचंड हुश्शार माणूस. chemistry ला कोण होत अबर नाव नाही आठवत आत्ता. Biology ला झेंडे सर होते ह्यांचा लेक्चर असताना दोन बेंच सोडून बसायचं कारण खूप थुंकी उडायची, शिकवण्याची पद्दत अप्रतिम होती, टाय घालून फिरणारे एकमेव शिक्षक होते हे. English वर होते अनबुलेसर हे एक थोड वेगळ व्यक्तिमत्व होत. त्यांना शिकवणे नित जमत नव्हत कि काय माहिती पण ते नेहमी विचित्र वागायचे, जाऊदेत पण माणूस म्हणून चांगले असावेत ते. असो. engineering चे lectures आणि professor ह्यांच्यावर पुन्हा कधीतरी लिहीन. असाच जेंव्हा बडबड करायचा मूड होईल खूप झाली बडबड वाचणारा बोर होणार आहे हे नक्की. शेवटी सगळ्या शिक्षकांना आणि शिक्षिकांना माझा नमस्कार त्यांना सगळ्यांचा आशीर्वाद असुदेत कि झाल. इथे माझ्या मनातल्या भावना मांडण्याचा प्रयत्न केला आहे, चुकून कुणाच्या भावना दुखावल्या गेल्यास क्षमस्व..

शुक्रवार, ३ सप्टेंबर, २०१०

ग्रुप कॅप्टन सचिन तेंडूलकर

मागच्या चार पाच दिवसापासून TV वर एकच बातमी एकत होतो, ती म्हणजे क्रिकेट - स्पॉट फिक्सिंग-पाकिस्तान आणि वाटत होत कि खेळाचा इतका वाईट घोडाबाजार होतोय कि कोणताही खेळ आणि कोणता तरी खेळाडू ह्यातून वाचू शकला असेल का?

एक भारतीय म्हणून मी एक नाव निश्चित घेऊ शकतो ते नाव म्हणजे सचिन तेंडूलकर. आमचा सचिन ह्या सगळ्या कलुषित वातावरणापासून कितीक अंतर दूर आहे. क्रिकेटच आपला देव आणि मैदान हेच आपल मंदिर असा विचार करणारा आमचा सचिन ह्या सगळ्या गोष्टींच्या आसपास देखील भटकणार नाही. हे असले विचार त्याच्या मनाला शिवत देखील नसतील. तो मुळात पैशासाठी खेळतच नाही तो खेळतो त्याच्या भक्तीसाठी एक एक धाव जणू तो आपल्या मैदान मंदिरात त्याच्या क्रिकेट देवाला अर्पण करत असतो. आणि प्रत्येक शतकाला घालत असतो अभिषेक धावांचा नवनवीन विक्रमांचा.

आज जेंव्हा बातमी एकली कि सचिन ला 'ग्रुप कॅप्टन' हि पदवी बहाल करण्यात आलीये तेंव्हा पुन्हा एकदा सचिन ला सलाम केला. त्याच्या प्रत्येक चौकार-षटकारा साठी टाळ्या वाजवायला उंचावणारे माझे हात आज उंचावले ते त्याला salute करायला. भारतीय वायुदलाने सचिनच्या उत्तुंग कामगिरीबद्दल आणि त्यान भारतासाठी क्रिकेट मधून दिलेलं योगदान ह्याच गौरव करण्यासाठी दिला गेला आहे. सचिन हा पहिलाच खेळाडू आहे ज्याला हे सन्माननीय पद प्राप्त झाल आहे. त्याची कारकीर्द हि कोणत्याही जवनापेक्षा किंचितही कमी नसावी. जेंव्हा जेंव्हा सचिन मैदानावर खेळत असतो तेंव्हा ती रणभूमी वाटू लागते आणि त्याच खेळ म्हणजे युद्ध. त्या युद्धातही असते कमालीची शिस्त, एकाग्रपणा, प्रामाणिकपणा आणि आक्रमक खेळी करूनही चेहऱ्यावर असतो आत्मविश्वास आणि शत्रूचाही विश्वास डळमळीत करणार त्याच स्मित हास्य. त्याच ते हास्याच देत असत आम्हालाही खात्री कि शेवटचा सैनिक आणि शेवटची गोळी असेपर्यंत लढू शकणारा हा आमचा योद्धा जोपर्यंत त्याची आग ओकणारी तोफ घेऊन त्याच्या जागी उभा आहे तोपर्यंत मैदानही आमचच आणि विजयही. त्याच्या ह्याच सर्व गुणांमुळे त्याला हि पदवी शोभून दिसते. त्याला मिळालेली हि पदवी आम्हा तरुणांना क्रिकेट प्रमाणेच वायुदलाकडेही आकर्षित करेल हीच अपेक्षा.

शनिवार, १ मार्च, २००८

नवे सदर: आठवणी मनातल्या-१

लहानपण देगा देवा । मुंगी साखरेचा रवा ॥

संत तुकारामांनी केलेल्या ह्या रचनेत खुप कमी शब्दात कीती सहजरित्या लहानपणाचा गोडवा गायला आहे. फक्त वयाच लहानपण नाहि तर वर्तणुकीतल लहानपण. लहानपणी आपण कसे होतो? अगदी देवाला हवे असतो तसे, निरागस. नुकत्याच जन्मला आलेल्या त्या बाळाला काहिही कळत नसत, तरीहि कधी कधी हसतो अगदी खदखदुन हसतो. कोणाबरोबर हसतोय? अस विचारल, तर गावची म्हातारी माणस म्हणतात कि, बाप्पा बरोबर हसतोय, शंकर-पार्वती म्हणे गुदगुल्या करतात बाळ रडु नये म्हणुन.
आज मी माझ बाळपण आठवण्याचा प्रयत्न करतोय, पण ते पहिल निरागस हास्य अणि रड्न नाहि आठवणार मला, कोणालाच नाहि आठवणार. कारण तो काळ बाळपणीच्या आधीचा काळ असतो देवपणीचा काळ. आपल्याला काही कळायच्या आणि लक्षात रहायच्या आधिच देवबाप्पा आपल्याला भुल देतो मग आपण सगळ देवपण विसरतो आणि कळायला लागल्यापसुनचा काळ म्हणजे बाळपण, असा माझा खुळा समज आहे. मला तर बाळपण देखिल नाहि आठवत ठिकस. पण खुळ्या मनाची खुळी धडपड हि धडपड फक्त बाळपण आठवाण्याची आहे असं नाहि, तर आज पर्यंतचा स्वतःचा प्रवास शब्दात माडंण्याचा प्रयत्न. अशाच काही पुसट आठवणी ताज्या करण्याचा प्रयत्न करणार आहे या सदरात. सदराच बारस केलं. नाव ठेवल ’आठवणी मनातल्या’.





बुधवार, ६ फेब्रुवारी, २००८

वपु


पहिल्या वहिल्या भेटीत माणसं किती जवळची व्हावीत याला काही हिशोब असतो का? गणित असतं का?
मैत्री म्हटलं की खरं तर हीशोब, गणितं वगैरे व्यवहारीक शब्द टीकतच नाहीत. तरीही हेच शब्द पटकन पुढाकार का घेतात?

कुठलेही हिशोब न ठेवता जी गणीताप्रमाणे नेमकेपणा देते ती मैत्री.

-वपु काळे

गुरुवार, २४ जानेवारी, २००८

एक अबोल "मोरपिस"........


विचरांच हे असं असतं काल पर्यंत त्या स्लॆमबुक ची आठवण पण नव्हती, काल मात्र बंड्याबरोबर गप्पा करताना विषय निघाला आणि बोलत सुटलो.

college चा शेवटचा वर्ष स्लॆमबुक भरण्याचि लगिन घाई चालू होति, स्लॆमबुक भरणे म्हणजे फ़ार काही कठीन वॆगरे असतं अशातला भाग नाही, जर तो एका मित्राचा असेल तर; पण एखाद्या मुलीचा असेल आणि ती मुलगी अगदी खास असेल तर..... तितकच अवघड होवून जात.

अशाच एका मुलीचा स्लॆमबुक माझ्याकडे आला , म्हणजे तिने दिला; एकदम अनपेक्षित पणे ती माझ्याकडे आली. मला अपेक्षाच नव्हती कारण, त्या तीन वर्षात ती खुप भाडंली मझ्यासोबत अगदी अबोलपने भाडांयची, अगदी अबोलपणे बोलयाची तिच्या अबोल नजरेन.

ती अबोल असायची कारण,
तिलाही माहित होत कि, मी तिच्यावर प्रेम करतोय
.

स्लॆमबुक माझ्या हातात देउन म्हणाली "लवकर परत दे" .
"बस्स... इतकच". अस्स म्हणाल ना तुम्ही.
माझ्यासाठी हेच खुप काही होत.
आता प्रश्न होता तो "काय लिहायच?"
मी
तिचा स्लॆमबुक चाळुन पहिला, जवळ जवळ last लिहीणारा मी असेन मोजुन मापुन - पान उरली होती . आता काय लिहायच हा विचार करत असताना माझं लक्ष B. L. Thareja च्यां पुस्तकाकडे गेलं, अणि अवघड प्रश्नाचं साध ऊत्तर सापडल. तीन वर्षांपासुन जपुन ठेवलेल्या पिंपळपानात ते ऊत्तर दडलं होत. First Year ला असताना तिच्या वहीतून पडलेल. ते पान तिच्या स्लॆमबुक मध्ये चिटकवून त्यावर लिहीलं,
"....मी"
दुसरया दिवशी तिला स्लॆमबुक परत दिला.
तिने मला विचारल "इतक्या लवकर झाल लिहून"
मी म्हंटल"हो".
तीने स्लॆमबुक उघडलं आणि आज ती हसली त्या "....मी" बरोबर अगदी मनसोक्त हसली पण तिचं हसण सुध्दा अबोल होत तिच्या अबोल भांडणासारख.
तिने विचारल "तुझा स्लॆमबुक नाहि का देणार मला लिहायला?".
मी हसुन म्हंटल "तु माझा स्लॆमबुक लिहिण्याची गरज नाहि वाटत मला"
तीन विचारल "का?"
तिच्या ’का?’ ला खरंच किती सरळ आणि साधं ऊत्तर होत; पण मी हि अबोलपणे टाळलं आणि म्हंटल, "देतो उद्या".

आज मला ती सॆमबुक परत करणार होती. lecture सपंला आणि तिने मला बाहेर बोलावल, स्लॆमबुक माझ्या हातात देउन निघुन गेली. एका पानावर मोरपिस चिटकवुन
तिन ही लिहीलं होतं,
"....मी"
ते मोरपिस आणि पिंपळपान खुप वर्षांपासुन एकत्र होते. तिच्या वहीत.
वहीतून पडलेल्या त्या पिंपळपानाची आणि मोरपिसाचि भेट होता होता राहिली..
पण मोरपिसांतली ती मात्र कायमची माझी झाली. आजही ती तशीच आहे अबोल.
एक अबोल "मोरपिस"........